आधी होते मी दिवटी,
शेतकऱ्यांची आवडती ।
झाले इवली मग पणती,
घराघरांतून मिणमिणती।
समई केले मला कुणी,
देवापुढती नेवोनी ।
निघुनी आले बाहेर,
सोडीत काळासा धूर।
काचेचा मग महाल तो,
कुणी बांधुनी मज देतो ।
कंदील त्याला जन म्हणती,
मीच तयांतिल परि ज्योती।
बत्तीचे ते रूप नवे,
पुढे मिळाले मज बरवे।
वरात मजवाचून अडे,
झगमगाट तो कसा पडे।
आता झाले मी बिजली,
घरे, मंदिरे लखलखली ।
देवा ठाऊक काय पुढे,
नवा बदल माझ्यात घडे।
एकच ठावे काम मला,
प्रकाश द्यावा सकलांला ।
कसलेही मज रूप मिळो,
देह जळो अन् जग उजळो।
: वि.म.कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा