रविवार, १४ मे, २०२३

ज्यांची हृदये झाडांची -मंगेश पाडगावकर


ज्यांची हृदये झाडांची 
- मंगेश केशव पाडगावकर
******
ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात
तेच वाढतात प्रकाश पितात, तेच ऋतू झेलून घेतात.

त्यांना मुळीच गरज नसते व्याख्यानबाज कंठांची
आणि कानठळ्या बसवणार्‍या अध्यात्मिक घंटांची.

त्यांना माणूस.. शिडी नसतो पाय ठेवून चढण्याची
त्यांच्या कुशित जागा असते हरलेल्याला दडण्याची.

ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात
तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात. 

-- मंगेश केशव पाडगावकर

बुधवार, १० मे, २०२३

पाऊस आला. ग्रेस

पाऊस आला पाऊस आला 
गारांचा वर्षाव 
गुरे अडकली रानामध्ये    
दयाघना तू धाव!

मेघांचे कोसळती पर्वत 
दरी निनादे दूर  
गाव चिमुकला वाहून जाईल 
असा कशाला पूर?

इवल्याला पक्षांच्या डोळी 
वृक्ष थबकले सारे 
आणि मुळाला त्यांच्या उपटे 
वेड घेतले वारे 
 
थांब जरासा हृदयी माझ्या 
 ढगात लपल्या देवा
 काठावरती जरा आणु दे
 पुरात फसल्या नावा 
                                                            
 या गावाच्या पारावरती 
 कुणी नसे रे वेडी 
 गढीत नाही भुजंग शापित 
 जो वंशाला तोडी 

 इथे कुणीतरी रचले होते 
 झिमझिम पाऊस गाणे 
 जाता येता टाकित  होता 
 तो चिमण्यांना दाणे 
  
ग्रेस

रविवार, ४ डिसेंबर, २०२२

माया महा ठगनी हम जानी, कबीर

माया महा ठगनी हम जानी,
तिरगुन फांस लिए कर डोले बोले मधुरे बानी,
केसव के कमला वे बैठी शिव के भवन भवानी,
पंडा के मूरत वे बैठीं तीरथ में भई पानी,
योगी के योगन वे बैठी राजा के घर रानी,
काहू के हीरा वे बैठी काहू के कौड़ी कानी,
भगतन की भगतिन वे बैठी ब्रह्मा के ब्रह्माणी,
कहे कबीर सुनो भई साधो यह सब अकथ कहानी।

कबीर

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या भक्तांना वेळोवेळी लिहीलेली पत्रे* *पत्र क्र. २५) भाग २*

*स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या भक्तांना वेळोवेळी लिहीलेली पत्रे* 
*पत्र क्र. २५) भाग २* 

संतवचन प्रत्ययाचे ।श्रवणीं पडतां आनंदें नाचें ।
म्हणें सुकृत शतजन्मांचे । साधन साचें कळले मज ॥१३॥

मग उत्कटत्वें करूं पाहे साधन ।परी तेतुला वेग न साहे म्हणोन ।
स्थिर न राहतां चंचळ मन ।होतसे खिन्न अंत:करणीं ॥१४॥

साधूं जातां सोऽहं जप ।साधनी येती नाना विक्षेप ।
पूर्वसंस्कारें संकल्प-विकल्प ।देती ताप साधकातें ॥१५॥

मग वाटें सोहंध्यान सोडावें ।बरवें रामनामचि घ्यावें ।
भावबळें रंगून जावें ।मन जडावें सगुण रूपीं ॥१६॥

सगुण रूप आठवी अंतरीं ।नाम-घोष गर्जे वैखरी ।
नाचे डोले उड्या मारी ।दूर सारी देहभाव ॥१७॥

परी तोहि आवेग ओसरे ।निघोन गेलें भक्तीचे वारें ।
नाचरें मन फिरे माघारें ।अखंड न मुरे सगुणरूपीं ॥१८॥

वृत्तीस आली चंचलता ।म्हणें कुंडलिनी जागृत होतां ।
आकाशमार्गे न चालतां । प्रकाश’ तत्वतां न दिसेचि ॥१९॥

म्हणोनि करी योगसाधन ।परी तेथेंहि न थारे मन ।
मग सद्गुरूसी रिघोनि शरण ।कृपादान मागतसे ॥२०॥

उदार सद्गुरु होती प्रसन्न ।शिष्यास सन्मुख बैसवोन ।
दाविती स्वानुभवाची खूण ।संशय निरसन जेणें होय ॥२१॥

तैं भ्रांतीचें मसैरे फिटे ।बुद्धीस न फुटती फांटे ।
संकल्प विकल्पांचे कांटे ।होती वाटेवेगळे गा ॥२२॥

दिसे चैतन्याची ठेव ।तेथें चित्त घेई धांव ।
प्रकट होता सोऽहं भाव ।नुरे नांव अहंतेचें ॥२३॥

सगुण आणि निर्गुण ।एकरूप पाहे संपूर्ण ।
श्रवण मनन निदिध्यासन ।साधन परिपूर्ण जाहलें ॥२४॥

मंगळवार, ७ जून, २०२२

उपयोग काय त्याचा ? विंदा .

 उपयोग काय त्याचा ?

 विंदा करंदीकर
***************
शब्दांत भाव नाही, 
ना वेध अनुभवाचा ;  
 रचना सुरेख झाली !                          
 उपयोग काय त्याचा ?

व्याहीच पत्रिकेचा, 
घालीत घोळ बसले;      
नवरी पळून गेली !                            
उपयोग काय त्याचा ?

सुगरण रांधणारी,
सुग्रास अन्न झाले ;     
अरसिक जेवणारे,                              
उपयोग काय त्याचा ?

जमली महान सेना, 
शस्त्रे सुसज्ज झाली ;      
नेता कचखाऊ निघाला,                      
उपयोग काय त्याचा ?

ऐश्वर्य प्राप्त झाले,   
झाली दिगंत कीर्ती ;    
स्नेही न एक लाभे !                          
उपयोग काय त्याचा ?

सर्वांस स्वास्थ्य आले,
सगळीकडे सुबत्ता ;     
स्वातंत्र्य फक्त नुरले !                          
उपयोग काय त्याचा ?

केले गुरु अनेक,   
यात्रा कित्त्येक केल्या ;   
शांती न प्राप्त होता,                          
उपयोग काय त्याचा ?

- विंदा करंदीकर

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

उरल्या सुरल्या ओलाव्यावर. शांता शेळके

उरल्या सुरल्या ओलाव्यावर
.          शांता शेळके
***********************

उरल्या सुरल्या ओलाव्यावर
किती जिवाला भिजवित राहू ?
म्लान आठवांतुनी चार या
किती बहर मी सजवित जाऊ ?

बुजत चालल्या पाऊलवाटा
हिरवे रुजवे फुटले त्यावर
तिथेच वळते हट्टी पाऊल
कसा तया मी घालू आवर ?

भिंत कोसळे या इथली अन्
उठे इमारत उंच पलिकडे
पालटात या जलद, किती मी
जुन्या खुणांचे वेचू तुकडे ?

मिटली अवघी क्षितिजे म्हणता
क्षितिज त्यातुनी पुनश्च उठते
कळसूत्री बाहुली तशी मी
पुन्हा यंत्रवत् धावत सुटते

शांता शेळके

शनिवार, १२ जून, २०२१

सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,


सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,

कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे |

कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ||

या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, 

घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी,

केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१||

या रानी, माझी करुणावाणी, काया कष्टील प्राणी,

ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी,

संकट होउनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२||

त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा,

लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा,

श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३||

*********:

नारायण स्वामींचे शिष्य गोपाळ यांनी लिहलेले पद.

गुरूविरहाने कासाविस झालेल्या शिष्याचे हे मनोगत आहे.

हे गु्रुदेव मला सांगा मी  कुठे जावू.कुणाला स्मरू.काय करू. कसे राहू। कसे येवून कुरुंदवाडीला स्वामीला भेटू.मिळवू . (नरसोबा वाडी)

याजगात संसारात व्यवहारी जगण्यात खाणे पिणे उठणे निजणे हे घडतच आहे.पण मला आपल्या जवळ घेवून माझा भार  उचलणारा, पालन करणारा, तसे वचन देणारा स्वामी कुठे आहे?

मी या संसार रूपी अरण्यात अडकलो आहे.आणि अतिशय दु खीकष्टी झालो आहे .      दु:खात मी रडत आहे ,ओरडत आहे, हाका मारत आहे ही माझी करूणावाणी कोण ऐकेल   ?आणि मला सुख देईल. दु खाने, तहानेने मी मुर्छित होऊन, बेशुद्ध होऊन पडलेलो असताना मला येऊन कोण बरे पाणी पाजील?

त्याचवेळी मी सत्पुरुषांचा समूह या माझ्या डोळ्यांनी पाहिला ते जवळआले त्यांनी माझ्या कपाळाला भस्म लावले आणि सांगितले हे गोपाळा  तू भय सांडून दे.

हे सत्पुरुष म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ होते .त्यानी या गोपाळला अभय दिले.