बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

माझी आई - नारायण सुर्वे


जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

तु असतीस तर --- मंगेश पाडगावकर

तु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे

बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावर खिन्न रितेपण

पसरली असती छायांनी
चरणातली म्रूद्शामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसुन मिश्किल

तु असतीस तर झाले असते
आहे त्याहुन हे जग सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धुसर अंतर …

- मंगेश पाडगावकर

प्रेमात पडलं की--- मंगेश पाडगांवकर

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;

जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!


केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,



प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा

शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण

आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

- मंगेश पाडगांवकर

उठा उठा चिऊताई- कुसुमाग्रज

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही !

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही !

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या ?

बाळाचें नी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनियां दूर जाई
भूर भूर.

- कुसुमाग्रज

मी फूल तृणातील इवले- मंगेश पाडगावकर

मी फूल तृणातील इवले
जरी तुझीया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारा

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे?

येशील का संग पहाटे
किरणांच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती
हळू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
दवबिंदू होउनी ये तू
कधी भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे

पण तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशा जरी दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

- मंगेश पाडगावकर

आई एक नाव असत..- फ. मुं. शिंदे

आई
आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.


- फ. मुं. शिंदे

पानगळ---इंदिरा संत



आला शिशिर संपत
पानगळती सरली,
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलीना लागली.

देवचाफा हा पहा ना
अंगोपांगी बहरला,
मोगराही कोवळ्याशा
पाने सजाया लागला.


डोळे खिळविती माझे
जास्वंदीची लाल फुले,
बहाव्याने येथे तेथे
सोनतोरण बांधिले.

'कुहू' गाऊन कोकिळा
करी वसंत-स्वागत,
तिलाही मी विनविते
शिकव ना मला गीत.

-इंदिरा संत